केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडलं, येत्या आठ दिवसात आक्रमक होणार : राजू शेट्टी

नंदुरबार,

एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणार्‍या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून देण्यात येणार्‍या नोटीस संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. केंद्राने घेतलेला निर्णय चांगला असल्याने त्याचा फायदा शेतकर्‍यांना होईल. मात्र, पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली आहे. तसेच केंद्र आणि राज्याने राज्यातील शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. अजूनही शेतकर्‍यांना कुठलेही प्रकारचे अनुदान मिळाले नसून शेतकर्‍यांचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तर विमा कंपनी आपले भांडे भरण्याचं काम करत असल्याचा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.

एफआरपी संदर्भात भूमिका

केंद्र सरकारने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला असून राज्यांकडून मत मागविण्यात येत आहे. एफआरपी कोणत्याही प्रकारात तीन तुकडे देण्यात येऊ नये, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. तसेच केंद्र सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने जास्तीचा भाव देणार्‍या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून नोटीस दिली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांना जास्तीचा भाव मिळत नव्हता. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता शेतकर्‍यांचा फायदा होईल. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित व्हावी, अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

काँग-ेस आणि राष्ट्रवादीच्या कुरघोडीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून या सरकारमधील काँग-ेस आणि राष्ट्रवादी काँग-ेसच्या मंत्र्यांमध्ये कुरघोडी असल्याचे दिसून येते. ऊर्जा खाते हे काँग-ेसकडे असल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पूर परिस्थितीची पाहणी करताना वीज जोडणी कट केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. आता अचानक वीज जोडणी का कट केली जात आहे. अर्थ विभाग त्याला परवानगी का देत नाही? अशी गत आहे. दोन रेड्यांच्या टकरीमध्ये कुंपणाचा चुराडा होत असल्याची गत शेतकर्‍याची होत असल्याचे शेट्टी म्हणाले.

राज्यात चार पक्षांच्या टोळ्या सक्रिय यंत्रणाचा दुरुपयोग

राज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नाचं कोणत्याही राजकीय पक्षाला काही पडलेले नाही. आर्यन खानचा जामीन कधी होईल हे सर्वांसाठी महत्वाचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून यंत्रणांचा अतिवापर होत असून हे राज्यासाठी चांगले नसून यंत्रणा ह्या कार्यकर्त्या सारख्या वागू लागले असल्याचा टोला राजू शेट्टी यांनी यावेळी लगावला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!