रासायनिक खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना

वाशिम प्रतिनिधी

दि. १६ जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. पेरण्या पूर्ण झाल्यानंतर रासायनिक खतांची मागणी वाढेल. रासायनिक खतांची विक्री शासनाने ठरवून दरानेच होणे आवश्यक आहे. जादा दराने रासायनिक खतांची विक्री होत असल्यास संबंधित कृषि सेवा केंद्रावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कृषि विभागाला दिले. खरीप हंगाम, कोरोना सद्यस्थिती यासह इतर विषयांचा आढावा घेण्यासाठी आज, १६ जून रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित सभेत ते बोलत होते.

आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, कृषि विकास अधिकारी विकास बंडगर या सभेला उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये पुरेशा प्रमाणात व वेळेवर बियाणे, खते उपलब्ध करून देण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या आहेत. आगामी काळात रासायनिक खतांची मागणी वाढणार असल्याने खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. बियाणे, खते मिळाले नाहीत, अशी कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. रासायनिक खतांची जादा दराने विक्री होवू नये, यासाठी तालुकास्तरीय भरारी पथकांना नियमितपणे कृषि सेवा केंद्रांची तपासणी करावी. तसेच बियाणे, खतांच्या अनुषंगाने कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्याअनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी.

पिक कर्ज वितरणात राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, काही बँकांकडून पिक कर्ज वितरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. त्यामुळे कमी प्रमाणात पिक कर्ज वाटप केलेल्या राष्ट्रीयकृत बँकेतील शासकीय ठेवी काढून जास्त प्रमाणात पिक कर्ज वितरण करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील सुमारे १२ महसूल मंडळांमध्ये एकाच दिवशी ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्या मंडळांमधील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाला सदार करावा. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी रस्ते, पूल वाहून जाण्याचे, पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. पावसामुळे नुकसानग्रस्त झालेले रस्ते, पूल यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करून वाहतूक पूर्ववत करावी. तसेच जिल्ह्यातील कमी उंचीच्या सर्व पुलांची पाहणी करून त्याठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे जमा झालेला गाळ, कचरा दूर करावा. जेणेकरून पाणी वाहून जाण्यास होणारा अडथळा दूर होईल व पुलावर पाणी येणार नाही, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

कोरोना लसीकरणावर लक्ष केंद्रित करा

सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे, ही चांगली बाब आहे. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करावे. जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. यासोबतच कोरोना चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले. तसेच म्युकरमायकोसीस आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या सद्यस्थितीची माहितीही त्यांनी घेतली. या आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आवश्यक इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

आमदार श्री. झनक म्हणाले, मुसळधार पावसामुळे शिरपूर ते वाशिम रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून संबंधित विभागाने सदर रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी कोरोना संसर्ग सद्यस्थिती, लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाला असून शासनाच्या नियमावलीनुसार पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यात वाशिमचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध हटविण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या लसीकरणावर अधिक भर दिला जात असून सध्या ४५ वर्षांवरील ५२ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी गावनिहाय नियोजन करून जनजागृतीवर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासाठी ‘एमआयडीसी’मार्फत एक ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी कोरोना सद्यस्थिती, खरीप हंगाम, पावसामुळे झालेले नुकसान, स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र व शेतमाल विक्री केंद्र उभारणी, सिंचन प्रकल्प सद्यस्थितीचा आढावा घेतला.

*******************************************************************************************************************

माद्रिदमध्ये स्पेनचा किंग फिलिप आणि क्वीन लेटिझिया यांनी कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन आणि त्यांची पत्नी किम जंग-सीओक यांचे स्वागत करताना.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!