’मला ईडीची नोटीस पाठवल्यावर महाराष्ट्राने भाजपाला वेडी ठरवलं’ : शरद पवार
सोलापूर,
महाराष्ट्रात कालपासून आयकर विभागाकडून धाड सत्र सुरू आहे. यामध्ये अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांच्या कार्यालयावर, अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आणि अजित पवारांच्या बहिणींच्या घरावर आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे. आयकर विभागाच्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग-ेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग-ेसचा मेळावा पार पडला या मेळाव्यात शरद पवारांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
शरद पवार म्हणाले, अजित पवारांकडे काही सरकारी पाहुणे पाठवले होते. ते पाहुणे येऊन गेले… पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणात मला ईडीची नोटीस पाठवली. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेचं मी कधी पद घेतलं नाही आणि असं असताना मला ईडीची नोटीस पाठवली. मला ईडीची नोटीस दिली, मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि संपूर्ण महाराष्ट्राने भाजपला वेडी ठरवली असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
सुप्रिया सुळे यांनी आयकर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देत म्हटलं, नुसते दादांचे नातेवाईक नाहीत आमचे देखील नातेवाईक आहेत. आमची जॉइंट फॅमिली आहे, संघर्ष करणे ही पवारांचे खासियत आहे. दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्ली पुढे झुकणार नाही आणि झुकला ही नाही. सुढाचे राजकारण आम्ही कधीही केले नाही आणि कधीही करणार नाही.
आयकर विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईवर अजित पवार म्हणाले, ‘पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत त्यांचं काम चालू आहे ते गेल्यावर मला काय बोलायचं आहे ते मी बोलेन. ते गेल्यावर मला काय भूमिका मांडायची आहे ती मांडेल. नियमाने जे असेल ते जनतेच्या समोर येईन त्यात घाबरायचं काय कारण‘.
जवाहरालाल छाजेड, मुकेश बग-ेचा, राजेंद्र घाडगे, सचिन शिनगारे, विरधवल जगदाळे यांच्याकडे काल साखर कारखान्याच्या संदर्भाने धाडी पडल्या होत्या. सचिन शिनगारे, विरधवल जगदाळे, राजेंद्र घाडगे, जरंडेश्वर, दौंड शुगर, जरंडेश्वर,आणि अंबालिका येथे आलटून पालटून डायरेक्टर होते.
अजित पवार यांनी गुरुवारी प्रतिक्रिया देत म्हटलं, आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे. जर आयकर विभागाला काही शंका असतील तर ते छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असणार्या काही कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. दरवर्षी आम्ही टॅक्स भरणारे आहोत. मी राज्याचा अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठला कर कसा चुकवायचा नाही, व्यवस्थितपणे टॅक्स कसा भरायचा हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे माझ्या सर्व कंपन्या, माझ्याशी संबंधित कंपन्यांचे टॅक्स वेळोवेळी भरले जातात. त्यात कुठलीही अडचण नाही.
ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने रेड टाकली की त्यांना आणखी काही माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सचे अधिकारीच सांगू शकतील. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर मला काही बोलायचं नाहीये. कारण मी सुद्धा एक नागरिक आहे असंही अजित पवारांनी म्हटलं.
अजित पवार पुढे म्हणाले, मला एका गोष्टीचं दु:ख आहे. माझ्या बहिणी ज्यांची 35-40 वर्षांपूर्वी लग्न झालं. त्या त्यांच्या-त्यांच घरी अतिशय चांगल्या पद्धतीने संसार करत आहेत. त्यापैकी कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सने धाड टाकल्या आहेत. याच्या पाठीमागचं कारण मला समजू शकलेलं नाहीये.