चिपी विमानतळाचे उद्घाटन : सिंधुदुर्गातील इन्फ्रास्टर माझ्यामुळेच आलंय – नारायण राणे
सिंधुदुर्ग
येथील इन्फ्रास्ट्रक्चर्स माझ्यामुळे आलंय, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. सिंधुदुर्गमधील विकास कोणामुळे झालाय हे, जनतेला चांगलंच माहिती आहे, असेही ते म्हणाले. चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्घाटन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधीया, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
जिल्ह्यात थेट पर्यटक येतील –
सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. हवाईमार्गे येणारे पर्यटक हे गोव्याकडे जातात. पण चिपीचे विमानतळ सुरु झाल्यानंतर थेट दिल्लीसारख्या महानगरातून जिल्ह्यात येणे पर्यटकांना सोपे जाणार आहे. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी फायदा होणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजू आणि मासळीचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. सध्या देशांतर्गतच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सिंधुदुर्गच्या देवगड हापूस आंब्याने मोठे नाव कमावले आहे. आंबा देशाच्या इतर भागांत आणि परदेशात निर्यात होऊ शकतो.