पालकमंत्री जयंत पाटलांना सत्तेचा माज अन् मस्ती आलीय – आमदार गोपीचंद पडळकर

सांगली,

पालकमंत्र्यांना सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे, अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री जयंत पाटील यांच्यावर केली आहे. शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आमदार पडळकर यांनी सांगलीमध्ये ही टीका केली. तसेच राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा तोंडावर आलेल्या दसरा, दिवाळी मध्येच एसटी कर्मचारी आंदोलन करतील, असा इशारा देखील यावेळी आमदार पडळकर यांनी दिला आहे.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पालकमंत्री जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मध्ये निधी खर्चाच्या तपशीलवरून शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर पडळकर यांनी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.

याबाबत आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांमध्ये जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून किती निधी खर्च झाला आणि तो कुठे झाला? याबाबत आपण प्रश्न उपस्थित केला होता. मात्र यावर उत्तर देण्यास जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री टाळाटाळ करत आहेत. याउलट ही माहिती समोर आली की जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये सर्वाधिक निधी वापरला गेला आहे. वास्तविक जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचा समान विकास झाला पाहिजे, असा शासन आदेश आहे. मात्र याबाबत विचारणा केली असता, पालकमंत्री जयंत पाटील हे उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. आम्ही बघून घेऊ अशी भाषा वापरत आहेत, म्हणजे या पालकमंत्र्यांना सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे, अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

राज्यातल्या एसटी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांच्या बाबतीत बोलताना आमदार पडळकर म्हणाले, एस टी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलनीकरण करायला हवे. तसेच एसटी कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवून एसटी महामंडळ मधील भष्टाचार थांबवाव्यात या प्रमुख मागण्या आपण राज्य सरकारकडे केल्या आहेत. मात्र राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येणार असेल तर आता तोंडावर दसरा, दिवाळी आली आहे, आणि या काळातच एस टी कर्मचारी आंदोलन करतील. मग जनतेचे जे हाल होतील, त्याला राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांचा राज्य सरकारला यावेळी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्यावर टाकण्यात आलेल्या आयकर विभागाच्या छाप्या बाबतीत विचारले असता, पडळकर म्हणाले, छाप्या बाबत पवार काय म्हणतात याला महत्व नाही. ती केंद्रीय यंत्रणा आहे आणि राज्यात छापे टाकत आहेत. आमच्यावर छापे का टाकत नाहीत? कारण आमच्याकडे जर पैसे नसतील तर आमच्यावर छापे कशाला टाकतील? एजन्सीकडे काय कागदपत्रे असतील त्यानुसार छापे टाकले असतील, असे मत आमदार पडळकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!