‘कोरोनामुक्त गाव’ वर लक्ष केंद्रित करुन जिल्हा कोरोनामुक्त करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कुडाळ एमआयडीसी येथे ६ के.एल. क्षमतेच्या लिक्विड ऑक्सिजन रिफिल प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी, दि. 4 (जि.मा.का.) – ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ या योजनेप्रमाणे कोरोनामुक्त गाव योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करावे. छोटी छोटी जबाबदारी स्वीकारून सांघिकरित्या जिल्हा कोरोना मुक्त करण्याचे मोठे काम करावे. आरोग्य सुविधा बळकट करणे याला प्राधान्य देत आहोत. भविष्यातील पुढची लाट आलीच तर त्यासाठी ऑक्सिजनची क्षमता वाढवणं, आरोग्य सुविधा वाढवणं, चाचण्यांची क्षमता वाढवणं याचे नियोजन आतापासूनच करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

कुडाळ एम.आय.डी.सी. येथे अवघ्या 15 दिवसात बसवण्यात आलेल्या युनायटेड एअर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी निर्मित 6 के.एल. क्षमतेच्या लिक्विड ऑक्सिजन रिफिल प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर हे ऑनलाईन सहभागी झाले होते. तसेच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सहायक जिल्हाधिकारी संजितe मोहोपात्रा, एमआयडीसीचे क्षेत्रीय संचालक अविनाश रेवणकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, युनायटेड एअर गॅस कंपनीचे अतुल नलावडे, अमोल नलावडे, सचिन आम्रे, संजय पडते, संदेश पारकर, अमित सामंत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोकणच्या किनाऱ्यावर नेहमीच नैसर्गिक संकटे येत असतात. पाऊस, कधी अतिवृष्टी तर कधी चक्रीवादळ अशा संकटांबरोबरच कोविडचाही मुकाबला करत आहात. केवळ मुकाबला न करता एक एक पाऊले पुढे टाकत आहात. तोही आगदी आत्मविश्वासाने. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून कौतुक करतो. पुढच्या संकटाची गंभीरता कमी करण्यासाठी तजवीज करणं आणि त्याचबरोबर संकट येणारच नाही त्यासाठी ही नियोजन करणं हे महत्वाचं आहे. सद्याच्या प्लांटची क्षमता 20 के.एल पर्यंत वाढवावी. त्याचबरोबर मागील अनुभव पाहता जिल्ह्याला भासलेल्या ऑक्सिजनची आवश्यकता पाहून तशी तरतूद करून ठेवा.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!