मनोधैर्य खचल्यानं दिपाली चव्हाण यांची आत्महत्या, चौकशी समिती अध्यक्ष राव यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी अहवाल?
नवी दिल्ली
मेळघाट मधील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांचे मनोधैर्य खचले म्हणून तिने आत्महत्या केली, असा अफलातून निष्कर्ष वनखात्याने गठित केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष एम.के. राव यांनी सेवानिवृतीच्या शेवटच्या दिवशी अहवालातून मांडला असल्याची माहिती आहे. मात्र, हा कथित अहवाल अंतिम नाही. 31 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत समितीने अहवाल फायनल केलेला नाही अशी माहिती मिळत आहे. पण या प्रकारामुळे मात्र आता संतापाची लाट उमटली आहे.
नागपूरचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव यांनी निवृत्तीच्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट 2021 रोजी स्वंतत्ररीत्या अहवाल तयार करून तो वनबल प्रमुख पी. साईप्रसाद यांच्याकडे सादर केला. मात्र, या अहवालात समितीमधील एकाही सदस्याची स्वाक्षरी नाही, अशी माहिती आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती.
आत्महत्या करण्यापूर्वी दिपाली चव्हाण यांनी वेगवेगळ्या तीन प्रकारच्या सुसाईड नोट लिहून ठेवल्या होत्या. यात चार पानी नोटमध्ये विनोद शिवकुमार हाच आत्महत्येस कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. एम.एस.रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याचे कारनामे वेळीच रोखले असते, तर आत्महत्या करण्याचा प्रसंग ओढवला नसता, ही बाब दीपाली यांनी स्पष्ट केली. असे असताना एम.के. राव यांनी स्वत: तयार केलेल्या अहवालातून विनोद शिवकुमार, एम.एस. रेडी हे दोषी नाहीत, असा अहवाल कशाच्या आधारे दिला, हा संशोधनाचा विषय आहे.
यासंदर्भात चौकशी समितीमधील एका सदस्याने सांगितले की, 7 तारखेला चौकशी समितीची मीटिंग होईल तेव्हा राव यांच्या अहवालावर चर्चा होईल आणि त्यात सदस्य आपली बाजू मांडतील. तेव्हाच हे ग-ाह्य धरायचा किंवा नाही हे स्पष्ट होईल.
मेळघाट मधील हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनविभागाच्या चौकशी समितीचा अहवाल अंतिम झालेला नाही तसेच अजून पर्यंत समितीने अहवाल सादर केलेला नाही अशी माहिती प्रत्यक्ष भेटल्यावर समितीचे सह अध्यक्ष आणि वन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी दिली आहे
31 ऑगस्ट रोजी समितीचे अध्यक्ष आणि अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक एम के राव हे सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त होताना त्यांनी समितीच्या आतापर्यंतच्या कामासंदर्भात एक नोट तयार करून ती समितीच्या सर्व सदस्यांना समोर मांडली मात्र कुठेही अंतिम अहवाल तयार करण्यात आलेला नाही किंवा तो सादर करण्यात आलेला नाही अशी माहितीही विकास गुप्ता यांनी दिली…
दरम्यान आता समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त झाल्यामुळे पुढे समिती चे अध्यक्ष कोण होतील या संदर्भातला निर्णय वनबल प्रमुख म्हणजेच प्रधान मुख्य वनसंरक्षक जी साईप्रकाश हे घेतील.. त्यानंतर समितीचा कामकाज पुढे सुरू होईल अशी माहितीही गुप्ता यांनी दिली.