जेवणात एकच चपाती दिल्याने चिमुकल्यांचा घेतला घास; चुलत भावाच्या कृत्याने जळगाव हादरलं!

यावल,

जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्या दोन चिमुकल्या चुलत भावांना विहिरीत टाकून त्यांचा जीव घेतला आहे. चुलत भावाच्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता, आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. जेवणात एकच चपाती दिल्याच्या रागातून आपण हा गुन्हा केल्याचं आरोपीनं कबुल केलं आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

निलेश सावळे असं अटक केलेल्या आरोपी चुलत भावाचं नाव आहे. तर रितेश रवींद्र सावळे (वय-6) आणि हितेश रवींद्र सावळे (वय- 5) हत्या झालेल्या चिमुकल्या भावंडाची नावं आहे. आरोपी निलेश सावळे हा मृत रितेश आणि हितेश यांचा चुलत भाऊ आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी असणार्‍या रवींद्र मधुकर सावळे आणि उज्ज्वला सावळे या दाम्पत्यास रितेश आणि हितेश अशी दोन अपत्ये होती. फिर्यादी रवींद्र यांची चुंचाळे शेतशिवाराला लागून गायरान भागात शेती आहे.

सावळे दाम्पत्य बुधवारी सकाळी आपल्या दोन्ही बालकांना घेऊन शेतात गेले होते. यावेळी रवींद्र सावळे यांचा पुतण्या निलेश देखील त्यांच्यासोबत होता. दरम्यान दुपारच्या सुमारास काम आटोपल्यानंतर, सावळे दाम्पत्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जेवण करण्यासाठी आवाज दिला. पण दोन्ही भावांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अनेक ठिकाणी शोधाशोध केल्यानंतर सावळे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं, संशयित आणि नातेवाईकांची चौकशी केली. दरम्यान चुलत भाऊ निलेश सावळे याच्या जबाबात पोलिसांना तफावत आढळली. त्यामुळे पोलिसांनी आरोपी निलेशला ताब्यात घेत, त्याची कसून चौकशी केली. यावेळी घाबरलेल्या आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. संबंधित मृत चिमुकल्यांनी आपल्याला नोकरासारखी वागणूक देत जेवणात एकच चपाती दिल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली दिली आहे. गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!